कृषी योजनासरकारी योजना

वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुरीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही जिल्हे आहेत कि त्या जिल्यामध्ये वन्य प्राणी किंवा अन्य मार्गाने पिकाचे नुकसान होत असते. पण शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई कशी मिळवायची याची माहिती नसते, तसेच तक्रार कोठे करायची याचीही माहिती नसते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचे नुकसान होत असते, हे नुकसान टाळण्यासाठी आपण या लेखामध्ये पिकाचे नुकसान झाल्यास त्याची तक्रार कोठे करायची, त्यासाठीचा अर्ज कसा करायचा, नुकसान भरपाई कशी मिळवायची, ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती पाहणार आहोत.

पीक नुकसानीची तक्रार तीन दिवसांत करावी:

जर आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर याची तक्रार अधिकार क्षेत्र असलेल नजीकचे वनरक्षक, वनपाल अथवा वन परिक्षेत्र अधिकारी यांच्यापैकी कोणाकडेही घटना घडल्यापासून तीन दिवसांत करावी.

>

पीक नुकसानीची शहानिशा:

पिकाचे जर नुकसान झाले आहे कि नाही याची शहानिशा संबंधीत वनरक्षक, कृषी सहाय्यक आणि तलाठी अशा तीन सदस्यांच्या समितीमार्फत १० दिवसाच्या आतमध्ये करण्यात येते. हि शहानिशा पिकाचे नुकसान झालेल्या जागेवर जाऊन करण्यात येते. हि समिती पंचनामा करणे, नुकसान क्षेत्राची मोजणी करणे, पुरावे तपासणे व नुकसानीचे मूल्य ठरविणे हे या समितीकडून कामे केली जातात. तसेच शेतकऱ्यांनी जर आपल्या मोबाईलवर छायाचित्रे काढून पुरावे गोळा करून ठेवल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी याची मदत होऊ शकते. काही वेळेला शासकीय कामाच्या व्यस्ततेमुळे हे तीन कर्मचारी एकत्र येण्यास विलंब होतो, पण याचे खापर वन कर्मचाऱ्यांवर फोडले जाते पण ते योग्य नाही.

आवश्यक कागदपत्रे:

पीक नुकसानीची तक्रार झाल्यानंतर काही कागदपत्रे सादर करावी लागतात यामध्ये पीक नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा, मोजणी व नुकसानीबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.

नुकसान भरपाईची रक्कम :

पीक नुकसानीची शहानिशा झाल्यानंतर नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित सहाय्यक वनसंरक्षक यांनी घटना घडल्याचे तारखेपासून तीस दिवसांत काढणे आवश्यक आहे. तसेच आदेश काढल्यानंतर एक महिन्याचे आत बाधित व्यक्तीला नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे. भरपाईची रक्कम शेतकऱ्याला उशिरात उशिरा साठ दिवसांत मिळालीच पाहिजे.

समजा जर ऊस पिकाचे नुकसान झाले असेल तर त्या नुकसानीसाठी रुपये ८०० प्रती मे. टन असे वजनावर आधारीत न ठेवता ज्या तालुक्यामध्ये ऊस पिकाचे नुकसान होईल त्या तालुक्याच्या मागील ८ वर्षाची कृषी विभागाने काढलेल्या उसाच्या उत्पादकतेवरून सरासरी उत्पादकता काढून त्यानुसार ऊस पिकाची नुकसान भरपाई देण्यात येते.

बंदूक परवान्यांचा संयमाने वापर करणे:

काही शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण करण्यासाठी बंदूक परवाने देण्यात आले आहेत, अशा व्यक्तीच्या शेतीची नुकसान भरपाई वन्यहत्ती ,रानगवा किंवा इतर वन्यप्राणी यांना इजा किंवा त्यांची शिकार झाली नसल्याची खात्री झाल्यानंतरच देण्यात येते. तसेच रानडुकरांची शिकार करण्याचे अधिकार संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पण अधिकार देऊनही त्या अधिकाराचा पुरेसा वापर करण्यात येत नसल्याने समस्या तीव्र झाली आहे. आता शेतकऱ्यांनाच रानडुकराच्या शिकारीचे परवाने दिल्याशिवाय समस्या सुटणार नाही असे वाटते. पण शेतकऱ्यांनीही बंधने पाळून संयमाने त्याचा वापर करायला हवा.

नुकसान भरपाई कोणाला मिळत नाही:

१) वनजमिनीवर अतिक्रमणाद्वारे करण्यात येणारी शेती.

२) भारतीय वन किंवा वन्यजीव अधिनियमांतर्गत ज्यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे अशा व्यक्तींची शेती.

३) ज्या कुटुंबात ४ पेक्षा जास्त गुरे मुक्त चराईसाठी जंगलात जातात त्या कुटुंबाची शेती.

४) मागील एक महिन्याच्या कालावधीत वन्यप्राण्यांच्या शिकारीची घटना झालेली गावे.

म्हणूनच जर नुकसान भरपाई हवी असेल तर गावकऱ्यांनी वन आणि वन्यजीव कायद्याचे पालन तर करायलाच हवे, पण वन विभागाच्या वन्यजीव संवर्धनाच्या कामात सक्रिय सहभागही घ्यायला हवा. सेवा हमी कायद्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम ३० ते ६० दिवसांत देण्याची तरतूद करण्यात आली आहे, पण शेतकऱ्यांनीही वेळोवेळी त्यासाठी पाठपुरावा करण्याची वनखात्यावर त्यासाठी सामाजिक दबाव टाकण्याची गरज आहे.

पीक नुकसानीचा ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस :

पीक नुकसानीचा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास प्रथम तुम्हाला खालील वनविभागाच्या वेबसाईट वर जायचे आहे.

https://mahaforest.gov.in/

त्यानंतर एक पेज ओपन होईल त्या पेजच्या वरती माहिती अधिकार/आरटीएस या पर्यायावर क्लिक करून आरटीएस सेवा (RTS) हा पर्याय निवडायचा आहे.

नंतर पब्लिक पोर्टल ओपन होईल त्यामध्ये तूम्हाला अनेक सेवा दिसतील त्यामधून तुम्हाला “वन्यप्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मंजुर करणे” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.

या पर्यायावरती क्लिक केल्यावर पुढील पेजवर तुम्हाला नुकसान भरपाईची माहिती भरायची आहे, यामध्ये शेतपिक या पर्यायामध्ये नुकसान भरपाईचा प्रकार टाकायचा आहे ,

नंतर अर्जदाराचे पूर्ण नाव , मोबाइल नंबर, नुकसानीचा प्रकार (ऊस ,पीक) यामधील पर्याय निवडायचा आहे. नंतर शेतकऱ्याचे नाव, जिल्हा, तालुका, तुमच्या जवळील कार्यालयाचे नाव ,पत्ता व ज्या दिवशी घटना घडली तो दिनांक टाकून ऍड (Add) या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.

ऍड या पर्यायावर क्लिक केल्यावर अर्ज प्रत दिसेल त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असतो.

या पेज ची तुम्ही प्रिंट काडून ठेवा. अर्ज भरल्यानंतर मोबाईल वर मेसेज येईल व वनविभागाचे अधिकारी नुकसान पहाणी दौरा करतील. त्यानंतर तुमच्या अर्जाला मंजुरी मिळून नुकसान भरपाई मिळेल.

अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील उपवनसंरक्षक / उप विभागीय अधिकारी / वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा.

हेही वाचा – प्रधानमंत्री फसल बीमा योजना सुरु (फळपिक विमा योजना) – २०२१-२४ नवीन शासन निर्णय जाहीर व ऑनलाईन अर्ज सुरु (PMFBY)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.