वन नेशन वन रेशन कार्ड योजना – आता रेशन कार्ड एटीएम कार्ड सारखं होणार !
केंद्र सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची घोषणा केली गेली आहे. वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजे एटीएम कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे. यामुळे रेशन कार्ड धारकाला कोणत्याही राज्यातील सरकारमान्य रेशन दुकानावरून आपल्या रेशन कार्डवर रेशन घेता येईल. यासाठी आधार कार्ड गरजेचं आहे. विशेष करून रोजगारासाठी इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या मजुरांना या योजनेचा अधिक फायदा होईल. ही योजना मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा संकल्प आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. याची सुरुवात बिहारमधून करण्यात आली आहे.
84 कोटी नागरिकांना या रेशन कार्ड चा फायदा:
आताचे जे चालू रेशन कार्ड आहे ते पिवळं, केशरी आणि पांढऱ्या रंगाचे होते त्याच्यामध्ये बदल करून ते आता एटीएम कार्डसारखं होणार आहे. वन नेशन वन रेशन कार्ड योजना आता नव्या वर्षात नव्या रुपात दिसणार आहे. याचा फायदा जवळपास 84 कोटी नागरिकांना होणार आहे. या नागरिकांना एटीएम कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे.
विस्थापित झालेल्या मजुरांना या योजनेचा लाभ:
वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा फायदा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर हे रेशन कार्ड देशातील कुठल्याही राज्यात चालणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी विस्थापित झालेल्या मजुरांना तसेच अन्य राज्यांत गेलेल्या नागरिकांना, या योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.
जवळील रेशन दुकानदाराकडे रेशन कार्ड बनवण्याची सुविधा:
या योजनेअंतर्गत सध्या जुन्या कार्डवरच धान्य मिळत आहे.पण तुम्हाला जर हे रेशन कार्ड बनवून घ्यायचे असेल तर तुमच्या जवळील रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता किंवा तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इतकच नाही तर तुम्ही स्वत:ही ऑनलाईन अर्ज करु शकता.
योजनेचा लाभ कसा घ्याल?
जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड लिंक करुनही रेशनचा लाभ मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे बीपीएल कार्ड असणं खूप गरजेचं आहे. तसेच काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. रेशन कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोर्टल आहेत. त्यावर बीपीएल कार्डधारक रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळालेली पोचपावती घेऊन तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या तहसील कार्यालयात जाऊन अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे.