वृत्त विशेषमहाराष्ट्र जमीन महसूल कायदासरकारी कामे

साठेखत म्हणजे काय? साठेखत करण्याचे फायदे काय आहेत?

विक्री करार – साठेखत, ज्याला इंग्रजीत Agreement to Sale असे म्हणतात म्हणजे करार किंवा विक्रीचा हेतू. साठेखताची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत. उदा. विसार, वायदा पत्र, बेचनामा इ.

साठेखत म्हणजे काय?

एखादी मालमत्ता भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार म्हणजे साठेखत होय. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, एखादी मालमत्ता जिच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार आपण पुढच्या काही ठरावीत काळात करणार आहोत, त्याविषयी माहिती देणाऱ्या कागदपत्राला साठेखत असं म्हणतात. यालाच विसार, वायदा पत्र, बेचननामा असंही म्हटलं जातं.

मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 च्या कलम 54 नुसार, साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार आहे.

>

केवळ साठेखत करुन घेतल्यामुळे खरेदीदाराचा संबंधित मालमत्तेवर कोणताही मालकी हक्क सिद्ध होत नाही.

जेव्हा या मालमत्तेची प्रत्यक्षात निंबधक कार्यालयात रेजिस्ट्रीची प्रक्रिया पार पडते आणि खरेदीदाराला रीतसर या व्यवहाराचं खरेदी खत दिलं जातं, तेव्हा खरेदीदाराचा तिच्यावरचा मालकी हक्क सिद्ध होत असतो.

साठेखत म्हणजेच Agreement to Sale किंवा Memorandum of Understanding (MOU).

आपणांस दुसर्यासोबत (व्यक्ती/संस्था/कंपनी इ.) सोबत काही करार करावयाचा असेल तर त्या कराराचा मसुदा हा बनवण्यासाठी वेळ लागू शकतो अशी परिस्थिती असेल तर ठळक मुद्दे स्पष्ट व्हावेत व जे प्रामुख्याने दोघांमधे ठरलं आहे ते त्वरित करार स्वरूपात बंदीस्त करावं अशी गरज असेल तर साठेखत करतात.

जो काही व्यवहार आहे त्याचा करारनामा बनवताना सखोल विचार करून मोठा दस्त बनणार असेल तर असा दस्त बनण्यासाठी काही कालावधी जाउ शकतो. मात्र तो व्यवहार ठरवताना त्या व्यवहारामधील मुख्य व ठळक अशा मुद्द्यांवर दोघांनीही सहमती केली की तो व्यवहार पक्का व्हावा यासाठी काही रक्कम अदा केली जाते. अशावेळेस सर्व ठरलेला व्यवहार हा मोजक्याच पण महत्त्वाच्या कलमांचे लिखाण करून पक्का केला जातो. असे जे दस्त बनवले जाते ते म्हणजे साठेखत.

अशा साठेखतामधे व्यवहारामधील महत्वाचे मुद्दे साध्या शब्दांमधे मांडले जावे एवढंच अपेक्षीत आहे.

साठेखत कशासाठी केले जाते ?

काहीवेळा जमिनीचे अथवा मिळकतीचे हस्तांतरण लगेचच करणे शक्य नसते. अशावेळी या व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी साठेखत केले जाते. जमीन भोगवटादार-२ ची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ती विकता येत नाही. त्याचप्रमाणे भाडेपट्टा, गहाण, दान किंवा कुठल्याही प्रकारचे जमिनीचे हस्तांतरण करता येत नाही. त्याचप्रमाणे जमिनीवर सरकारचे आरक्षण असेल किंवा जमिनीचे प्रत्यक्ष मोजमाप आणि चतुःसीमा माहीत नसेल अथवा जमिनीवर इतरांचा ताबा किंवा अतिक्रमण असेल, अशा अडचणी असल्यास जमिनीचे लगेचच खरेदीखत करून हस्तांतरण होणे शक्य नसते.

तसेच काही व्यवहार मोठे असतात, अशावेळी खरेदीदाराकडे पूर्ण व्यवहाराचे पैसे नसतात. टोकन म्हणून काही पैसे दिले जातात व उर्वरित रक्कम टप्प्याटप्याने घेण्याचे ठरलेले असते. अशा व्यवहारात घेणारा व देणारा या दोघांनाही ‘कायदेशीर संरक्षण देण्यासाठी साठेखत केले जाते.

बऱ्याचदा खरेदीदार कर्ज काढून मालमत्ता घेत असतो. कर्ज काढण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावे मालमत्तेची कागदपत्रे किवा करार करणे गरजेचे असते. अशावेळी साठेखत केले जाते. जेव्हा खरेदीदाराला कर्ज मिळते तेव्हा उर्वरित रक्कम देऊन खरेदीखत केले जाते.

नोंदणीकृत साठेखताचे फायदे काय?

साठेखत 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करता येऊ शकते. पण, नोटरीकडे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेले साठेखत कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही. अशा साठेखताची शासकीय अभिलेखात नोंद करता येत नाही.

तसेच  दुय्यम निबंधक कार्यालयात साठेखत करू शकता. यालाच registered किंवा नोंदणीकृत साठेखत असे म्हटलं जातं. हे साठेखत करताना तुम्हाला मालमत्तेचं पूर्ण मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावं लागतं. हे कायदेशीरदृष्ट्या फायद्याचं असतं. कारण अशा साठेखताची नोंद महसूल दप्तरात ‘इतर हक्क’ या सदरात नोंदवली जात असते. नोंदणीकृत साठेखत केल्यास पुढे प्रत्यक्षात खरेदी करताना खरेदीदाराला मुद्रांक नोंदणी शुल्क भरावे लागत नाही.

किंवा असे नोंदणीकृत साठेखत केले आणि काही कारणास्तव हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही, तर हे असे साठेखत रद्द करता येऊ शकते. त्यासाठी दुय्यम निंबधकाकडे रीतसर अर्ज करता येतो.

पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर खरेदीदाराला त्यानं भरलेले मुद्रांक शुल्क परत मिळते.

साठेखतात नमूद महत्वाच्या बाबी

  • साठेखतात प्रामुख्यानं पुढील बाबींची माहिती नमूद केलेली असावी –
  • मालमत्ता विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तींची नावं, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक
  • मालमत्तेचा तपशील जसं की मालमत्तेचं ठिकाण, गट नंबर व क्षेत्रफळ, मालमत्तेच्या चारही बाजूंना काय आहे त्याची माहिती.
  • खरेदीदार ठरलेली रक्कम कशा स्वरुपात आणि किती वेळात विक्रेत्याला देणार याचा तपशील.
  • साठेखत केल्याच्या दिनांकापासून ते कधीपर्यंत प्रत्यक्षात अंमलात आणण्यात येईल.
  • जर या मुदतीत खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला नाही तर काय परिणाम होतील.
  • साठेखत करताना काही रक्कम आगाऊ स्वरुपात देण्यात आली आहे का?
  • कोणत्या कारणासाठी मालमत्ता विकणार आहे याची माहिती. मालमत्तेवर काही बोजा किंवा कर्ज आहे का? मालमत्तेसंबंधी कोर्ट केस आहे का, वाद आहे का? याची माहिती.
  • जमीन विकणाऱ्या व्यक्तीकडे ही जमीन कशी आली आहे ते पाहणे. म्हणजे विक्रेता जमिनीचा पूर्ण मालक आहे का ते पाहणे. यासाठी जमिनीचा वकिलांकडून सर्च रिपोर्ट घेता येऊ शकतो.
  • या मालमत्तेबाबत याआधी काही व्यवहार, गहाण खत, साठेखत केले होते का?
  • साठेखत कोणत्या परिस्थिती केलं जातं?

साठेखत रद्द करणे शक्य:

  • साठेखताला पूर्ण मुद्रांक व नोंदणी शुल्क लागते. नंतर असे मुद्रांक व नोंदणी शुल्क खरेदीखतास लागत नाही. पुढे जमिनीचे हस्तांतरण खरेदीखताद्वारे केले जाते.
  • खरेदीखतानंतरच पुढे ‘रेकॉर्ड ऑफ द राइट्स’ ला नाव लागते व मालमत्तेचे टायटल पूर्ण होते.
  • साठेखत कधीही रद्द होऊ शकते. खरेदीखत मात्र सहजासहजी रद्द होत नाही.

कधीकधी काही व्यवहार मोठे असतात. म्हणजे 50 लाख ते काही कोटी रुपयांमध्ये असतात. अशावेळी खरेदीदाराकडे पूर्ण पैसे नसतात. तेव्हा टोकन म्हणून आधी काही पैसे दिले जातात आणि मग उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्यानं द्यायचं ठरतं. अशावेळी दोन्ही बाजूंकडून साठेखत केलं जातं.

बऱ्याचदा खरेदीदार कर्ज काढून मालमत्ता घेत असतो. कर्ज काढण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्त्तीच्या नावावर मालमत्तेची कागदपत्रं गरजेची असतात. अशावेळी साठेखत केलं जाते. याद्वारे खरेदीदाराला कर्ज मंजूर होतं आणि जेव्हा प्रत्यक्षात रेजिस्ट्रीची प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा त्याला ती कागदपत्रे कर्ज देणाऱ्या संस्थेत जमा करावी लागतात.

साठेखत करताना तुम्ही ज्या अटी-शर्थींवर मालमत्ता विकत घेत आहात, त्याची माहिती अचूकपणे नमूद करणं गरजेचं असतं.

“केवळ नोटरीवर केलेलं साठेखत किंवा ईसारपावतीला कायदेशीर मान्यता नसते. त्यामुळे विक्रेत्यानं ती नाकारली तर अडचण निर्माण होते. त्याऐवजी दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात जाऊन स्टॅम्प ड्यूटी भरून नोंदणीकृत ईसारपावती किंवा साठेखत करुन घेणं कधीही चांगलं,”

तर “अनोंदणीकृत ईसारपावतीतून एखाद्या मालमत्तेच्या व्यवहारासाठी तुम्ही काहीतरी आगाऊ रक्कम दिली, एवढीच त्यातून खात्री होते. समोरच्यानं ती नाकारली की तिला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे नोंदणीकृत साठेखत हा एक चांगला पर्याय आहे.”

हेही वाचा – मालमत्ता (जमीन/घर/दुकान) यांचे नोंदणी कागदपत्रे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.