किसान क्रेडिट कार्ड वाटप; किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहीम सुरु ! – Kisan Credit Card
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याबाबतची मोहीम केली आहे. सदरची मोहीम ही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून देशभर राबविण्यात येत आहे. यासाठी “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” नावाची मोहीम दि. २४.०४.२०२२ ते दि.०१.०५.२०२२ या कालावधीत देशभर राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेच्या सर्व पात्र शेतक-यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) उपलब्ध करण्यात येतील. राज्यात पी. एम. किसान नोंदणीकृत एकुण ११४.९३ लाख लाभार्थ्यांपैकी ८९.३६ लाख लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. राज्यात जवळपास ३३.५७ लाख पी.एम. किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्ड धारक नाहीत.
यासाठी दि. २४.०४.२०२२ रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पी. एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेत पी.एम. किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील. केंद्र शासनाने या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यप्रणाली (SOP) उपलब्ध करून दिलेली असून किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने करावयाची आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सदरची मोहिम राबविण्यात येईल.
संबंधित सर्व बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या वाहत कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन दि. ०१/०५/२०२२ पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करणेची कार्यवाही पुर्ण करतील. यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची आणि त्यांचे पी.एम. किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारीत पेमेंटसाठी अधिकृत करून घेण्यासाठी संनियंत्रण करावे असे निर्देश मा. आयुक्त कृषि यांनी दिले आहेत. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांचे जिल्हा व्यवस्थापक व कृषि विभाग हे दि. २४ एप्रिल २०२२ रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत पीक विमा योजने विषयी शेतकऱ्यांना माहिती देतील.
तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घ्यावा यासाठी दि. २६ एप्रिल २०२२ रोजी गावनिहाय पीक विमा पाठशाला” चे आयोजन करण्यात येत आहे. या पाठशाळेमध्ये शेतक-यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन शेतक-यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी निर्देश मा. आयुक्त कृषि यांनी दिले आहेत. या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करून “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहीम यशस्वी करण्यासाठी मा. आयुक्त कृषि यांनी सुचना निर्गमित केल्या आहेत.
हेही वाचा – PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी किसान क्रेडिट कार्ड बनवू घ्या – Kisan Credit Card
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!