वृत्त विशेषसरकारी योजनास्पर्धा परीक्षा

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना – Scholarship Scheme for Higher Education Abroad

राज्यातील कांदळवन क्षेत्राचे व्यवस्थापन, संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्यस्तरावर मुख्य वनसंरक्षक, कांदळवन यांचे नियंत्रणाखाली दिनांक २३.०२.२०१२ रोजीच्या शासन निर्णयान्वये कांदळवन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिनांक २३.०९.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाने कांदळवन व सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान (Mangrove Foundation) ची स्थापना केली आहे. कांदळवन प्रतिष्ठानाच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश राज्याच्या किनारपट्टी आणि सागरी भागात कांदळवन आणि तेथील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पर्यावरणीय व बहुविद्याशाखीय संशोधनास प्रोत्साहन देणे आहे. त्या अनुषंगाने राज्यातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयातील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवण्यात आला होता. त्यानुषंगाने मंत्रिमंडळाने दिनांक ३.०५.२०२३ रोजी घेतलेल्या निर्णयास अनुसरुन याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन आहे.

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना – Scholarship Scheme for Higher Education Abroad:

महाराष्ट्र राज्यातील जे गुणवंत विद्यार्थी कांदळवन व सागरी जैवविविधता या तद्नुषंगीक विषयात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी THE (Times Higher Education) Ranking 200 च्या आतील / किंवा QS (Quacquarelli Symonds) Ranking 150 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतील, अशा एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी, असा शासनाने निर्णय घेतला आहे.

२. प्रस्तुत योजना महसूल व वन विभागाच्या वन उपविभागांतर्गत “गुणवंत मुलामुलींना कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे” या नावाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राबविण्यात येईल. सदरचा उपक्रम ३ शैक्षणिक वर्षांसाठी असेल.

>

३. या योजनेची व्याप्ती पुढीलप्रमाणे राहील :-

प्रस्तुत योजना सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता लागू राहील. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागांवर विद्यार्थीनींची निवड करण्यात येईल.

४. शिष्यवृत्तीची पदव्युत्तर पदवी / पीएचडी निहाय विभागणी:-

सदर शिष्यवृत्तीसाठी खालीलप्रमाणे प्रत्येक वर्षासाठी विद्यार्थी मर्यादा निश्चित करण्यात येत आहे:-

अभ्यासक्रमपदव्युत्तर पदवीपीएच.डीएकूण
Marine Science, Marine Ecology, Oceanography, Marine Biology, Marine Fisheries, Marine Bio-Technology / Microbiology, Bio-diversity etc.151025

५. अभ्यासक्रमाचा कालावधी :-

i) पीएचडी – ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी या पेक्षा जो कमी असेल तो.

ii) पदव्युत्तर पदवी – २ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल तो.

६. सर्वसाधारण अटी व शर्ती :-

i) विद्यार्थी व विद्यार्थ्याचे आई / वडील अथवा पालक भारताचे नागरीक तसेच महाराष्ट्र राज्याचे आधिवासी असावेत.

ii) विद्यार्थ्याला परदेशातील THE (Times Higher Education) Ranking 200 च्या आतील/ किंवा QS (Quacquarelli Symonds) Ranking 150 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.

iii) विद्यार्थ्यांने पदव्युत्तर किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. तसेच त्याने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

iv) परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा.

v) एक्झेक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झेक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांस प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

vi) प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ मान्य केली जाणार नाही.

vii) सदर योजना भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून UG /PG अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण घेण्याकरिता लागू राहील..

७. वयोमर्यादा:-

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थीच्या वयाची कमाल ३५ वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी लाभार्थीच्या वयाची ४० वर्ष वयोमर्यादा असावी. (दिनांक १ जुलै रोजीचे वय )

8. शैक्षणिक पात्रता :-

पदव्युत्तर पदवीसाठी पदवीधर व पीएचडी साठी संबंधीत विषयात पदव्युत्तर पदवी ही शैक्षणिक पात्रता राहील.

i) परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ६०% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

ii) पी. एच. डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ६०% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

iii) ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उत्तीर्ण केलेला असावा.

९. उत्पन्न मर्यादा:-

i) विद्यार्थ्यांच्या पालकांचे / कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वत:चे उत्पन्न धरुन सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न रु.२०.०० लाखापेक्षा जास्त नसावे.

ii) विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फार्म नं. १६ व सक्षम प्राधिकारी (तहसीलदार किंवा नायब तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

iii) इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी (तहसीलदार किंवा नायब तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

१०. एकाच कुटुंबातील कमाल पात्रताधारक :-

i) सदर योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल.

ii) एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल.

iii) सदरची शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल. एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.

११. अर्ज करण्यासाठी अनिवार्य अटी:-

  1. नोकरीमध्ये असलेल्या उमेदवारांनी तो जेथे नोकरी करतो त्या यंत्रणेचे (organization Employer) ना-हरकत प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.
  2. पात्र विद्यार्थ्याने Non-Judicial Stamp Paper वर Public Notary समोर विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक असेल.
  3. विद्यार्थ्याने दोन जामीनदार देणे बंधनकारक असेल. या प्रत्येक जामीनदाराने स्वतंत्र Surety Bond करुन देणे बंधनकारक असेल.
  4. अर्ज करणा-या विद्यार्थ्याचे स्वास्थ्य चांगले असले पाहीजे. त्याकरिता त्याने नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
  5. विद्यार्थ्यास शासनाने विहित करून दिलेल्या नमुन्यात Record Release Consent Form हा बंध पत्राच्या स्वरूपात द्यावा लागेल.
  6. विद्यार्थ्यांस परदेशामध्ये प्रवेश मिळण्यासाठी THE (Times Higher Education) Ranking 200 च्या आतील / किंवा QS (Quacquarelli Symonds) Ranking 150 च्या आतील अद्ययावत जागतिक क्रमवारीत असलेल्या विद्यापीठ / शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी स्वतः प्रयत्न करावा लागेल व त्यासाठी आवश्यक त्या सर्व पात्रता परीक्षा देणे बंधनकारक असेल.
  7. ज्या विद्यार्थ्याना परदेशी शैक्षणिक संस्थांकडून Unconditional Offer Letter मिळालेले असेल त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील, यासाठी Conditional Offer Letter गृहीत धरले जाणार नाही.
  8. विवाहीत उमेदवाराच्या पत्नी व मुले यांना परदेशामध्ये सोबत घेवून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहाय्य दिले जाणार नाही. त्यासाठी पासपोर्ट मिळविणे, व्हिसा मिळविणे, आर्थिक तरतूद करणे, परदेशातील निवास व दैनंदिन खर्चाची व्यवस्था करणे ही उमेदवाराची वैयक्तिक जबाबदारी असेल.
  9. नोकरी करणाऱ्या उमेदवारांनी सर्व प्रशासकीय बाबी उदा. रजा, वेतन आणि इतर सेवेच्या बाबी या स्वत: प्रत्यक्षपणे निराकरीत करावयाच्या आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची सवलत शासनाकडून मिळणार नाही.
  10. (अ) अचानक उध्दभवलेल्या परिस्थितीमध्ये, परदेशामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यास भारतामध्ये यावयाचे असल्यास त्यासाठी त्याचे संबंधित शिक्षण संस्था आणि संबंधित शिक्षण संचालनालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल आणि याबाबतची माहिती संबंधित विद्यार्थी भारतीय दूतावासात कळवतील.
  11. (ब) जेवढ्या कालावधीमध्ये परदेशातील शैक्षणिक संस्थेमधून दूर असेल, तेवढ्या कालावधीचा कोणताही खर्च यास अनुज्ञेय होणार नाही. तथापि, तो पुन्हा त्याच शैक्षणिक संस्थेत त्याच अभ्यासक्रमाचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी हजर झालेल्या दिवसापासून त्यास देय लाभ अनुज्ञेय होतील.
  12. (क) अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने परत त्याच परदेशी शिक्षण संस्थेमध्ये हजर न होता शिक्षण अर्धवट सोडल्यास त्यास अदा करण्यात आलेले शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इतर शुल्क व निर्वाह भत्त्याची व्याजासह वसुली करण्यात येईल, याबाबतचे लेखी हमीपत्र विद्यार्थ्यास द्यावे लागेल.
  13. पासपोर्ट व व्हिसा मिळविण्याची जबाबदारी उमेदवार/ विद्यार्थ्यांची असेल.
  14. उमेदवारास/विद्यार्थ्यांना केवळ ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये, ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे व शिष्यवृत्ती मिळाली आहे त्याच कारणासाठी व्हिसा घेणे बंधनकारक असेल.
  15. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे व आवश्यक ते करारनामे देणे बंधनकारक असेल.
  16. निवड झालेल्या विद्यार्थ्यास त्याच्या शैक्षणिक कालावधीमध्ये जास्तीची रक्कम अदा झाली असल्यास त्याची परतफेड करणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल. अथवा ती वसूल करणे बाबत प्रचलित कायदे व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारक असेल.
  17. सदर शिष्यवृत्तीच्या बाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने घेतलेला निर्णय अंतिम असेल.
  18. या शिष्यवृत्ती चा लाभ घेवून पूर्ण करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचा लाभ राज्य शासनास होणे या योजनेमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र राज्यात परत येवून त्याचा अभ्यासक्रमाचा लाभ राज्यास होईल याकरीता आवश्यकतेनुसार राज्य शासनास सेवा देणे अपेक्षित आहे. जर विद्यार्थी कांदळवन प्रतिष्ठानात काम करण्यास इच्छुक असेल तर त्यास प्राधान्य देण्यात येईल.

१२. विद्यार्थ्यास मिळणारे लाभ:-

परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यास खालील लाभ देण्यात येतील-

  1. परदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेल्या संपूर्ण फी मधून वार्षीक रु.१५.०० लक्ष अथवा निर्धारित शैक्षणिक शुल्क यापैकी जी कमी असेल ती रक्कम कांदळवन प्रतिष्ठान, मुंबई मार्फत थेट संबंधित शैक्षणिक संस्थेस अदा करण्यात येईल.
  2. विद्यार्थ्यांस परदेशात राहण्याच्या कालावधीसाठी विद्यापीठाने ठरवून दिल्यानुसार वैयक्तिक आरोग्य विमा (Personal Health Insurance) काढणे अनिवार्य राहील. यासाठीचा संबंधीत विद्यापीठाच्या निकषानुसार होणारा खर्च विद्यार्थ्यांस स्वत: करावा लागेल.
  3. खालील बाबींवरील खर्च अनुज्ञेय राहणार नाही:
  • व्हिसा अर्जारील खर्च
  • विद्यार्थी किंवा त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचा प्रवास व इतर खर्च
  • नियमित शिक्षणाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षणावरील खर्च
  • भाषा प्रशिक्षणावरील खर्च
  • निर्वाह भत्ता
  • आरोग्य विमा.
  • संशोधन,पुरक शैक्षणीक साहित्य, क्षेत्रभेटी, कार्यशाळा / सेमिनार, अंतरवसियता (Internship) यामधील सहभागाचा खर्च.
  • संगणक व तत्सम शैक्षणिक साहित्य.

4.विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून, तसे शैक्षणिक संस्था / विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.

5. प्रवेशित विद्यार्थ्यांने प्रत्येक सहा महिन्याच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे (Utilisation Certificate), खर्चाच्या पावत्या इ. विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडून प्रमाणित करुन सादर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय पुढील हप्ता मंजूर होणार नाही.

6. अपवादात्मक प्रसंगी, विद्यार्थ्यांनी / पालकांनी, परदेशी शिक्षण संस्था / विद्यापीठ, शिक्षण फी अनुज्ञेय फी स्वत: भरलेली असेल, अशा वेळी आवश्यक त्या पावत्या व पुरावे सादर केल्यानंतर, अशी रक्कम विद्यार्थ्यास देय होणाऱ्या शिष्यवृत्ती मधून विद्यार्थ्यांच्या परदेशातील खात्यावर जमा करणेसाठी कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

7. विद्यार्थ्यांने भारतात राष्ट्रीयकृत बँकेत व परदेशात अधिकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. त्याच खात्यावर त्यांना देय होणारी शिष्यवृत्ती CMP किंवा RTGS किंवा SWIFT ने अदा केली जाईल. या खात्याचा तपशील त्यांने परदेशात जाऊन प्रवेश घेतल्या नंतर तात्काळ कांदळवन प्रतिष्ठान यांना सादर करावा. तसेच शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने कांदळवन प्रतिष्ठान यांनी आवश्यकतेनुसार मागणी केल्यास विद्यार्थ्यांने संबंधित बँक खात्याचा तपशील कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांना सादर करावा.

8. परदेशी शिक्षण संस्था/ विद्यापीठाने ऑफर लेटर मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीचे निर्धारित केलेल्या फीच्या मर्यादेतच लाभ संबंधित विद्यार्थ्यास अनुज्ञेय होतील.

१३. कर्तव्यात कसूर (Default under the scheme):-

  • या योजनेखाली निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने परदेशात शिक्षण घेताना नियमाचे तसेच अटी व शर्तीचे आणि बंधपत्रामध्ये लिहून दिलेल्या बाबींचे उल्लंघन केल्यास, परदेशीय शैक्षणिक संस्थेने अभ्यासाविषयी अथवा वागणूकीविषयी अथवा गैरहजेरीविषयी प्रतिकूल अहवाल दिल्यास, विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्धवट सोडला असल्यास, विद्यार्थ्यांनी जेथे प्रवेश घेतला आहे तो देश सोडून निघून गेला असल्यास एका विद्यार्थ्याने दुसरे विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमध्ये विनापरवानगी प्रवेश घेतला असल्यास किंवा विद्यार्थ्यांची च्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे तो अभ्यासक्रम त्यांनी विनापरवानगी बदलल्यास किंवा तो भारतात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता परत आल्यास अशा विद्यार्थ्यांना कसुरवार (Defaulter) समजण्यात येईल आणि त्याला देण्यात आलेली शिष्यवृत्तीची सर्व रक्कम १२% वार्षिक व्याजाने वसूल करण्यात येईल अशा प्रकारचे संयुक्त हमीपत्र विद्यार्थी व पालक यांनी सादर करणे आवश्यक राहील.
  • कोणतेही कारण अथवा सबबी सांगून अभ्यासक्रम पूर्ण न करणे, विहित प्रयोजनासाठी खर्च न करणे, विहीत लाभ मर्यादेपेक्षा जास्तीची मागणी परदेशात जावून करणे, कोणत्याही प्रकारचा दबाव आणणे किंवा धमकी देणे, सदर नियमावलीतील तरतुदीचे उल्लंघन करणे, परदेशातील नियम/ अटी/ तरतूदीचे उल्लंघन करणे, वाममार्गास लागणे, परदेशातील शैक्षणिक कालावधीत कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य करणे व त्यासाठी दंड, शिक्षा होणे, भारतीय राष्ट्रीयत्वास हानी पोहचविणे, भारताची बदनामी करणे याबाबी कर्तव्यातील कसूर समजण्यात येतील. कर्तव्यात कसूर केलेल्या विद्यार्थ्यास / उमेदवारास अपात्र ठरवून त्याच्या परदेश शिक्षणासाठी शासनाने दिलेले सर्व लाभ व्याजासह वसूल केले जातील.

१४. अर्ज करण्याची पध्दती :-

i) सदरची योजना या शासन निर्णयातील नियमावली, अटी व शर्ती नुसार राबविण्यासाठी शासन प्राधिकृत करेल त्या यंत्रणेकडून अथवा कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांचे मार्फत राबविण्यात येईल.

ii) सदर शिष्यवृत्तीसाठी प्रत्येक वर्षी एप्रिल / मे महिन्यात कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांचेशी विचार विनिमय करून प्राधिकृत केलेल्या यंत्रणेमार्फत वृत्तपत्रात तसेच कांदळवन कक्ष / कांदळवन प्रतिष्ठानाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करतील.

iii) सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत अथवा शासन निर्धारित करेल इतक्या कालावधीत विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाईन सादर करावेत. अभ्यासक्रम निहाय असलेल्या क्षमतेच्या अधीन राहून, निवड समितीने निश्चित केलेली पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी साधारणतः दिनांक १ जुलै पूर्वी अथवा निवड समितीच्या निर्णयानंतर शासन जाहीर करेल.

iv) शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठानामार्फत संबंधित विद्यार्थ्यांना कळवून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती मागविण्यात येईल. तसेच या विद्यार्थ्याची गृहचौकशी करण्यात येईल.

v) दिनांक १५ जुलैपर्यंत संबंधित विद्यापीठाकडून आवश्यक ती माहिती प्राप्त करुन घेऊन त्यानंतर १५ दिवसाच्या आत विद्यार्थ्यांना संबंधित परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यकतेनुसार अग्रीम मंजूर करण्यात येईल.

vi) विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेवून आवश्यक ती माहिती व अग्रीम रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र/ पोचपावती संबंधित परदेशी शैक्षणिक संस्थेकडून प्रमाणित होऊन प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांस त्या वर्षीचे अग्रीम समायोजित करुन पहिला अर्धवार्षिक हप्ता अदा करण्यात येईल.

vii) प्रत्येक सहा महिन्याने विद्यार्थ्यानी दिलेल्या शिष्यवृत्तीचे (शिक्षण फी) उपयोगिता प्रमाणपत्र आणि प्रगती अहवाल कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांना सादर केल्यानंतर पुढील ६ महिन्याची शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल. प्रत्येक ६ महिन्याला विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अहवाल प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यास पुढील शिष्यवृत्ती अनुज्ञेय होणार नाही.

viii) सदर अर्जासोबत विद्यार्थ्याने खालील कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे :-

  • विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज,
  • सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला,
  • पदवी / पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पुरावे.(सनद/ मार्क लिस्ट ),
  • परदेशातील THE (Times Higher Education) Ranking २०० च्या आतील / किंवा QS (Quacquarelli Symonds) Ranking १५० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये नवीनप्रवेश मिळाल्याबाबतचे विनाअट (Unconditional) ऑफर लेटर,
  • ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे माहिती पत्रकाची (Prospectus) प्रत.
  • आवश्यक ते करारनामे व हमीपत्रे.
  • दोन भारतीय नागरीकांचे जामीनपत्र,
  • संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी वर्ष निहाय आवश्यक असणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक ज्यामध्ये शिक्षण शुल्काचा समावेश असावा.
  • विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि पी. एच. डी. अभ्यासक्रमासाठी अद्ययावत THE/QS World Ranking ची जागतिक क्रमवारी.

१५. गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करण्याची कार्यपद्धती:-

i) शिष्यवृत्ती साठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांपैकी इतर सर्व अटींची पूर्तता होणा-या विद्यार्थ्यांच्या प्राप्त गुणांचे मुल्यांकन खालीलप्रमाणे करुन त्याचे एकूण गुण विचारात घेऊन गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी :

अ) पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी:

अ. क्र. उत्तीर्ण केलेला अभ्यासक्रमप्राप्त केलेले गुणगुणांचे मुल्यांकन
1माध्यमिक शालांत परिक्षा (SSC)60% पेक्षा कमी0
60 ते 80%5
80% पेक्षा जास्त10
2उच्च माध्यमिक परीक्षा (HSC)60% पेक्षा कमी0
60 ते 80%5
80% पेक्षा जास्त10
3पदवी60% पेक्षा कमी0
60 ते 70%5
71 ते 80%15
80% पेक्षा जास्त30
4THE and QS World Ranking Average1 ते 5050
51 ते 150 (QS)

51 ते 200 (THE)

40

आ) पीएचडी अभ्यासक्रमासाठी:

अ. क्र. उत्तीर्ण केलेला अभ्यासक्रमप्राप्त केलेले गुणगुणांचे मुल्यांकन
1माध्यमिक शालांत परिक्षा (SSC)60% पेक्षा कमी0
60 ते 80%5
80% पेक्षा जास्त10
2उच्च माध्यमिक परीक्षा (HSC)60% पेक्षा कमी0
60 ते 80%5
80% पेक्षा जास्त10
3पदवी60% पेक्षा कमी0
60 ते 70%5
71 ते 80%15
80% पेक्षा जास्त20
4पदव्युत्तर पदवी60% पेक्षा कमी0
60 ते 70%5
71 ते 80%15
80% पेक्षा जास्त20
5THE and QS World Ranking Average1 ते 5040
51 ते 150 (QS) 51 ते 200 (THE)30

ii) निर्धारित केलेल्या सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रथमतः वरील “अ” व “आ” करिता दोन स्वतंत्र एकत्रित गुणवत्ता याद्या तयार कराव्यात.

iii) अ) गुणवत्ता यादी तयार करतांना समसमान (Tie) गुणवत्ता असलेल्या प्रकरणी THE/QS World Ranking जेष्ठताक्रम असलेल्या विद्यार्थ्यास गुणवत्ता यादीत वरचे स्थान देण्यात यावे.

ब) त्यानंतरही समसमान गुण असल्यास पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता पदवी अभ्यासक्रमाचे आणि पीएचडीअभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे गुण विचारात घेण्यात यावेत.

क) त्यानंतरही समसमान गुणवत्ता असल्यास वयाने जेष्ठ असलेल्या उमेदवारास वरचे स्थान देण्यात यावे.

iv) मात्र, गुणवत्ता यादीमध्ये समसमान गुणवत्ता असलेल्या प्रकरणी वरील ३ ब) व ३ क ) चा विचार न करता या विद्यार्थ्याची निवड करताना कांदळवन व सागरी जैवविविधता संबंधीत अभ्यासक्रमांचा प्राधान्याने विचार केला जाईल. उदा. Climate Change & Mangrove Bio- diversity, Carbon Sequestration in Mangroves, Sea level Rise and Mangroves §. अभ्यासक्रमांना प्राधान्य दिले जाईल.

v) गुणवत्ता याद्या तयार केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी. ही निवड करताना एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये ३०% विद्यार्थिनींची निवड करणे आवश्यक आहे. तथापि, निवड यादीत निर्धारित प्रमाणात विद्यार्थिनींचा समावेश होत नसल्यास संभाव्य निवड यादीतील उतरत्या क्रमानुसार शेवटच्या विद्यार्थ्याऐवजी विद्यार्थिनीची निवड ३०% च्या मर्यादेत करण्यात यावी.

vi) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी जर एखादा उमेदवार उपलब्ध झाला नाही तर त्या वर्षापुरते त्याच शाखेमधील पीएचडी अभ्यासक्रमाच्या जागेवर निवड यादीतील जेष्ठता क्रमानुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

vii) पीएचडी अभ्यासक्रमासाठी जर एखाद्या अभ्यासक्रमामध्ये उमेदवार उपलब्ध झाला नाही तर त्या वर्षापुरते त्याच शाखेमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागेवर निवड यादीतील जेष्ठता क्रमानुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

viii) निवड यादीस शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ते आदेश निर्गमित करण्यात येतील.

ix) प्रस्तूत योजनेंतर्गत प्रवर्गनिहाय निवड करण्यात येणार नसून गुणात्मक कसोटीवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे, तथापि, गुणात्मक निवडीव्दारे प्राप्त आवेदकांची संख्या एकूण प्रस्तावित शिष्यवृत्ती संख्येपेक्षा कमी असल्यास केवळ गुणवत्तेच्या आधारावर विचार करण्यात येईल. मात्र आवेदकांची संख्या जास्त असल्यास मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

१६. अन्य अटी व शर्ती:-

i) परदेशात अभ्यासक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्याने दोन महिन्याच्या आत कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांना अंतिम परीक्षेचे गुणपत्रक प्रमाणपत्र व प्रगती अहवाल व पदवीदान समारंभाचे छायाचित्रासह माहिती सादर करणे बंधनकारक असेल.

ii) अभ्यासक्रम संपल्यानंतर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास व्हिसा मुदतवाढीसाठी परवानगी दिली जाणार नाही. अभ्यासक्रमाचा कालावधी कोणत्याही कारणास्तव वाढल्यास त्यास अतिरीक्त निधी दिला जाणार नाही.

iii) ज्या विद्यापीठांमध्ये/ शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, ते विद्यापीठ/ शैक्षणिक संस्था हे त्या देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/ शैक्षणिक संस्था असावी (Accredited University / Institute) या संबंधीची कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी. याबाबत काही वाद निर्माण झाल्यास परदेशातील भारतीय उच्चायुक्त यांचेकडून खात्री करून निवड समिती त्याबाबत निर्णय घेईल.

iv) अर्जात नमूद केलेले विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी काही कारणास्तव विद्यार्थी प्रवेश घेवू शकत नसल्यास, त्याच विद्यापीठात त्याच अभ्यासक्रमासाठी पुढील एका सत्राचा (६ महिन्याचा) कालावधी, कोणतेही अतिरीक्त शुल्क न आकारता संबंधित विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेने विनाअट वाढवून दिल्यास आणि विद्यार्थ्याने त्यासाठी सबळ कारण / पुरावा सादर केल्यास अशी मुदतवाढ देण्याचे अधिकार कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांना असतील. तद्नंतर विद्यार्थ्यास आणखी मुदतवाढ मिळणार नाही.

v) एकदा निवड झालेले विद्यापीठ व अभ्यासक्रम कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. मात्र, सबलीकरण (Reinforcement) विचारात घेवून अशा बदलास मान्यता देण्याचे अधिकार शासनास राहतील.

vi) निवड झालेल्या विद्यार्थ्याला विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ काही अगावू रक्कम भरण्याची आवश्यक असल्यास, अशा आगावू रकमेस मान्यता देण्याचे अधिकार कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांना राहतील, मात्र, ही आगावू रक्कम पुढील देय हप्त्या मध्ये समायोजित करण्यात येईल.

vii) अभ्यासक्रमाच्या कालावधी व्यतिरीक्त कोणत्याही परिस्थितीत वाढीव कालावधीच्या व्हिसासाठी मान्यता देण्यात येणार नाही.

vii) आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, वर्तणूक, खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र व इतर तद्नुषंगिक बाबींचा अहवाल परदेशातील भारतीय दूतावासाकडून प्राप्त करुन घेण्यात येईल.

ix) अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यानंतर परदेशातील वास्तव्यासाठी कोणताही पत्रव्यवहार कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठानाकडे केला जाणार नाही, अथवा विद्यार्थी / पालक यांचा पत्र व्यवहार विचारात घेतला जाणार नाही.

x) परदेशी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी GRE (Graduate Record Examination) TOEFL (Test of English as a foreign language), IELTS (International English Langauge Testing System) इ. प्रकारच्या परीक्षा जेथे अनिवार्य आहेत, त्या उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल.

xi) विद्यार्थ्यांने शिष्यवृत्तीसाठी अर्जामध्ये नमूद केलेले विद्यापीठ व अभ्यासक्रम त्यांचा कालावधी आणि खर्चाचे तपशिल यामध्ये निवड समितीने निवडीची शिफारस केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.

xii) काही कारणास्तव विद्यार्थ्यास त्याची निवड होऊनही त्यावर्षी प्रवेश घेता आला नाही, तर त्यास वयोमर्यादेच्या अधिन राहून पुढील वर्षी नव्याने शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याची मुभा राहील.

xii) परदेशातील भारतीय दुतावासात राज्य शासनाकडून संबंधित विद्यार्थ्यांचा अहवाल, वर्तणूक, खर्चाचा हिशोब इ. माहिती पुरविण्याबाबत विनंती करण्यात येईल, तसेच काही विपरीत बाबी असल्यास, परदेशातील भारतीय दूतावास त्या बाबी राज्य शासनास कळवतील. परदेशात प्रवेशित विद्यार्थ्याच्या प्रगती विषयी मार्गदर्शन आणि सल्ला देण्याबाबत परदेशातील दुतावासास विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना परदेशात काही अडचणी उद्भवल्यास मदत करण्यासाठी या दुतावासास विनंती करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात / शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ तेथील भारतीय परदेशी दूतावासास संपर्क साधून आपली नोंदणी करावी व त्याचा तपशील कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांना सादर करावा.

xiv) पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने ज्या विषयाची संशोधनासाठी निवड केली आहे, त्याविषयाचा भारतामध्ये कोणत्याही विद्यापीठामध्ये अंतिम प्रबंध अहवाल (Thesis) सादर केला नसल्याबाबत चे घोषणापत्र (Declaration) सादर करणे आवश्यक आहे.

(xv) प्रस्तुत शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पीएचडी अभ्यासक्रमातील लाभार्थी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष पुर्ण झाल्यानंतर त्यांचे संशोधन प्रबंध प्रमाणित राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये (peer-reviewed journal) प्रसिध्द करणे आवश्यक राहील

(xvi) निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व दर्जा वाढीसाठी आवश्यक असलेले शिथीलीकरण करण्याचे अधिकार यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षासह कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान यांना असतील.

१७. खोटी माहिती सादर करणे:-

कोणत्याही विद्यार्थ्याने खोटी माहिती / कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाल्यास अथवा उपरोक्त परिच्छेद “१३” प्रमाणे कर्तव्यात कसुर केल्यास, त्यास ताबडतोब पुढील शिक्षणासाठी अटकाव (Debarred) केला जाईल व त्याच्याकडून झालेल्या खर्चाची १५% चक्रवाढ व्याजाने प्रचलित धोरणानुसार वसूली करण्यात येईल, अशा विद्यार्थी / उमेदवाराचा काळ्या यादीत समावेश केला जाईल. तसेच प्रचलित कायद्यानुसार त्याच्या विरुध्द कारवाई करण्यात येईल आणि त्यांनी दिलेले जामीनदार आणि संदर्भ अधिकारी / व्यक्ती यांना सुध्दा ही बाब लेखी स्वरुपात कळविण्यात येईल.

१८. छाननी समिती:-

या शिष्यवृत्ती साठी विहित मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती असेल-

१. कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान – अध्यक्ष

२. मुख्य वनसंरक्षक, मंत्रालय, महसूल व वन विभाग – सदस्य

3. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे. – सदस्य

4. संचालक, BNHS – सदस्य

५. उप संचालक, प्रकल्प, कांदळवन प्रतिष्ठान – सदस्य

६. उप संचालक, संशोधन आणि क्षमता बांधणी, कांदळवन प्रतिष्ठान – सदस्य

७. सह संचालक, कांदळवन प्रतिष्ठान – सदस्य सचिव

उपरोक्त समिती प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन अभ्यासक्रम निहाय पदव्युत्तर पदवी व पीएचडीसाठी राखीव कोटयानुसार आणि परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेच्या जागतिक क्रमवारीच्या जेष्ठते नुसार पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव निवड समितीकडे अंतिम करण्यासाठी पाठवेल.

१९. निवड समिती :-

उपरोक्त छाननी समिती मार्फत प्राप्त झालेल्या विद्यार्थ्याच्या यादी / प्रस्तावामधून पात्र विद्यार्थ्याची निवड यादी तयार करणेसाठी निवड समितीची रचना खालील प्रमाणे असेल:-

१. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, वन – अध्यक्ष

2. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण – सदस्य

3. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, वित्त – सदस्य

4. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, पर्यावरण – सदस्य

५. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, नागपूर – सदस्य

६. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) – सदस्य

७. मुंबई विद्यापीठाचे कांदळवन व सागरी जैवविविधता विषयक तज्ञ प्राध्यापक दर्जाचे प्रतिनिधी – सदस्य

८. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई/ कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान – सदस्य सचिव

२०. प्रस्तूत योजनेसाठी चालू आर्थिक वर्षामध्ये रुपये ४.०० कोटी इतका अतिरिक्त नियतव्ययाची कांदळवन प्रतिष्ठानच्या अर्थसंकल्पात स्वतंत्रपणे तरतूद करण्यात आली आहे. सदर योजनेसाठी जाहिरात देणे, ऑनलाईन अॅप्लिकेशन तयार करणे, कंत्राटी तत्वावर आवश्यक त्या नियुक्त्या इत्यादीवर होणारा खर्च कांदळवन प्रतिष्ठानाव्दारे करण्यात येईल.

२१. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून ही योजना महा डी. बी. टी. पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात यावी.

२२. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१५/२०२३/१४७५, दि.२४.०१.२०२३ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.११०/२०२३ /व्यय-१०, दि.१०.०३.२०२३ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग शासन निर्णय :

“गुणवंत मुलामुलींना कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणे” योजना राज्यात लागू करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – Apply Online For Maha DBT Scholarship

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.