वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

Rte 25 % प्रवेश सन 2022-23 साठी ऑनलाईन अर्ज करा; नियम, अटी, पात्रता सविस्तर माहिती जाणून घ्या

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2022-23 साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक 16/02/2022 पासून सुरु झाले आहे. गोंदिया जिल्हा दुपारी 3 नंतर सुरू होत आहे. उर्वरित जिल्हे दिनांक 17/02/2022 दुपारी 3 नंतर अर्ज भरू शकतील.

Rte 25 % प्रवेश सन 2022-23 साठी ऑनलाईन अर्ज करा; नियम, अटी, पात्रता सविस्तर माहिती जाणून घ्या:

दरवर्षी प्रमाणे सन २०२२-२३ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:

१. आपल्या जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी विहित मुदतीत करण्यात यावी. सदर प्रक्रिया जलद होण्यासाठी पुरेसे संगणक असलेल्या व इंटरनेट सुविधा असलेल्या शाळेत तालुकानिहाय मुख्याध्यापक यांची कार्यशाळा घेवून शाळा नोंदणी पूर्ण करावी. शाळा नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही.

२. ऑनलाईन प्रक्रियेत शाळेने केलेल्या नोंदणीची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी. ज्या शाळा २५ टक्के प्रवेशाकरिता पात्र आहेत परंतु नोंदणी करत नाहीत किंवा प्रवेश स्तरावरील एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करुन देत नाहीत, अशा शाळांबाबत तात्काळ नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी.

  • सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता आरटीई पोर्टलवर शाळा नोंदणी करताना लगतच्या तीन वर्षाचे आरटीई विद्यार्थ्यांचे प्रवेश वगळून इतर ७५ टक्के विद्यार्थ्याच्या प्रवेशाची संख्या घ्यावी व त्याची सरासरी करुन त्यास ०३ ने भागाकार करुन येणारी संख्या ही त्या शाळेची आरटीईची प्रवेश क्षमता राहील. तथापि, आरटीई प्रवेश क्षमता ही ३०-३० च्या दोन तुकड्या धरुन, त्याचे २५ टक्के म्हणजे जास्तीत जास्त १५ अशी राहील.
  • चालु वर्षापासून नवीन नोंदणी करताना नवीन स्वयंअर्थसहाय्यित शाळांत ३ वर्षापर्यंत आरटीई प्रवेश देण्यात येवू नयेत. त्यांची गुणवत्ता व सर्वसाधारण (Open) प्रवेश तपासून निर्णय घेण्यात यावा.
  • जुन्या शाळांबाबत – ज्या शाळेत इयत्ता १ ली ते ८ वी च्या वर्गातील एकूण संख्येच्या ५० टक्के पेक्षा जास्त आरटीई ची मुले प्रवेशित आहेत, अशा शाळेत आरटीई प्रवेश देवू नये, व अशा शाळांची नोंदणी करण्यात येवू नये.

३. गट शिक्षणाधिकारी यांनी शाळांनी केलेल्या नोंदणीची पुर्नपडताळणी करावी. पूर्नपडताळणी केल्यावर शाळांनी पुन्हा आपल्या शाळेचा प्रवेश स्तर आणि सन २०२२-२३ या वर्षाकरीता शाळेची प्रवेश क्षमता (Vacancy) मुद्दा क्र. २ प्रमाणे तपासून पाहणे अनिवार्य राहिल.

४. गट शिक्षणाधिकारी यांनी पोर्टलवर शाळा पडताळणी (Verify) केल्यावर तसा मेसेज NIC तर्फे शाळांना जाईल. उदा. (आपल्या शाळेचा प्रवेशस्तर असून २०२२-२३ या वर्षाकरीता प्रवेश क्षमता आहे.)

५. सन २०२१-२२ या वर्षी नोंदणी झालेल्या आर.टी.ई. २५ टक्के पात्र शाळांचे आपोआप Auto Registration NIC द्वारा करण्यात येते. तथापि, या सर्व शाळांचे मुद्या क्र. २ प्रमाणे Verification BEO स्तरावरून करण्यात यावे. तसेच नव्याने अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झालेल्या शाळा व अल्पसंख्यांक शाळा विचारात घेवून नोंदणी प्रक्रियेतून वगळण्याची आवश्यक कार्यवाही करावी. शाळा अधिकृत रित्या स्थलांतरीत झाली असल्यास त्या शाळेचा पत्ता व गुगल लोकेशन बदलाबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. कोणतीही पात्र शाळा नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी.

६. सर्व प्रथम आरटीई प्रवेश पात्र शाळांनी इयत्ता पहिलीचा डेटा सरल पोर्टलवर अपडेट करावा आणि मगच सन २०२२-२३ करीता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी. अन्यथा आरटीई पोर्टलवर रजिस्ट्रेशन/व्हेरीफिकेशन करताना आरटीई २५ टक्के Vacancy अपडेट करता येणार नाही.

७. गट शिक्षण अधिकारी स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासणीकरीता पडताळणी समित्या गठीत कराव्यात. तसेच महानगरपालिका स्तरावर देखील अशाच प्रकारच्या समित्या निर्माण कराव्यात. समितीमध्ये आवश्यक बदल करण्याची मुभा संबंधित अधिकाऱ्यांना राहील. पडताळणी समितीने खालील बाबींची तपासणी करावी.

निवासी पुरावाबाबत 

  • सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता शासन पत्र दिनांक ०७/०१/२०२२ नुसार निवासी पुराव्यामधील नमूद गॅस बुक हे रद्द करण्यात आलेले आहे. निवासी पुरावा म्हणून गॅस बूक हे गृहीत धरु नये.
  • सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रवेश घेण्याकरीता निवासी पुराव्याकरिता फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात यावे. निवासी पुरावा म्हणून इतर स्थानिक बँकेचे तसेच पतसंस्थेचे पासबूक गृहीत धरु नये.
  • निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टैक्स देयक/घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक इ. यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा. यापैकी पुरावा नसल्यासच भाडेकरार ग्राह्य धरण्यात यावा.
  • भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी परंतु भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी १ वर्षाचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची केव्हाही पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक/पालक राहत नाही असे आढळून आल्यास खालील प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
  1. कायदेशीर कारवाई करणे.
  2. सदर बालकाचा प्रवेश रद्द करणे
  3. आरटीई मध्ये प्रवेश झाला तरीही सर्व फी संबंधित पालकाने भरणे.
  4. या वरील ३ पैकी सर्व किंवा योग्य ती कारवाई करण्यात येईल.
  • जन्मतारखेचा पुरावा.
  • जात प्रमाणपत्र पुरावा. (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे.)
  • उत्पन्नाचा पुरावा सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेतांना विद्यार्थ्याच्या पालकांचा सन २०२०-२१ किंवा २०२१-२२ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरावा. उत्पन्नाच्या दाखल्याकरीता salary slip, तहसिलदारांचा दाखला, कंपनीचा किंवा Employer चा दाखला गृहीत धरावा.
  • दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधिक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
  • पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना single Parent (विधवा, घटस्फोटित आई अथवा वडील या पैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात यावेत.
  • उत्पन्नाचा दाखला व जातीचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही.

८. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांला पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

९. लॉटरी झाल्यांनतर शाळेला आर.टी.ई. पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील विद्यार्थ्याच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत शाळांनी प्राप्त करून घ्यावी. कागदपत्राची प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटर वर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करुन पालकांना परत करावे. तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे.

१०. काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर झाले असल्याची शक्यता आहे, त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक आले नाही तर त्यांना पुन्हा पुढची तारीख देण्यात यावी. दुसऱ्यांदा दिलेल्या तारखेला उपस्थित न राहील्यास तिसऱ्यांदा तारीख देण्यात यावी. अशा प्रकारे पालकांना तीन वेळा संधी द्यावी. बालकांना प्रवेश घेण्याकरिता शाळेने पालकांशी संपर्क साधावा.

११. शाळेने पडताळणी समितीची दिनांक व वेळ घेऊन पालकांकडून संकलित केलेली सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे घेऊन जावे व पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करावेत.

१२. सूचना क्र. ९, १० व ११ बाबत पालकांनी पोर्टल वरील अद्यावत सूचनांचे अवलोकन करावे.

१३. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात शाळा असल्यास अथवा शाळा अन्य कामासाठी प्रशासनाने ताब्यात घेतली असल्यास अशा शाळांनी प्रतिबंधित क्षेत्रातील अटी शिथील झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करावी.

१४. कागदपत्रे तपासणी याकरिता गट शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी. पडताळणी समितीची रचना खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र. समितीची रचना संख्या समितीतील स्थान
1 गट शिक्षण अधिकारी 1 अध्यक्ष
2 केंद्र प्रमुख 2 सदस्य
3 मुख्याध्यापक शासकीय शाळा 2 सदस्य
4 मुख्याध्यापक अनुदानित शाळा 2 सदस्य
5 मुख्याध्यापक विनाअनुदानित शाळा 2 सदस्य
6 शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी 2 सदस्य
7 पालक संस्थांचे प्रतिनिधी 2 सदस्य
8 शिक्षकांचे प्रतिनिधी 2 सदस्य
9 पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी 2 सदस्य
10 स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी 2 सदस्य
11 विस्तार शिक्षण अधिकारी 1 सदस्य सचिव

१५. पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरीता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. गट शिक्षण अधिकारी यांनी प्रत्येक बालकाला ३ वेळा प्रवेशाकरीता दिनांक देवून संधी पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आरटीई पोर्टल वर Not Approch करावे. पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

१६. पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व दिसते का याची खात्री करावी.

१७. पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्याची आकडेवारी विचारात घेवून पडताळणी विषयक कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे. पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगल वरील पत्ता व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्याची करावी. सामाजिक वंचित संवर्गातील विद्यार्थ्यांकरिता जात प्रमाणपत्राची तर आर्थिक दुर्बल संवर्गातील विद्यार्थ्याकरीता उत्पन्न प्रमाणपत्राची पडताळणी करावी. या दृष्टीने आवश्यक सुविधा गट शिक्षण अधिकारी स्तरावर करण्यात यावेत.

१८. समितीने संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे तपासणी करून प्रमाणित केल्यांनंतर सदर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सुविधा आर. टी. ई. पोर्टलवर करण्यात येत आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेले पात्र विद्यार्थी गट शिक्षण अधिकारी यांचे स्वाक्षरीचे पत्र घेवून शाळेत जातील. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. जे विद्यार्थी कागदपत्रे तपासणीमध्ये अपात्र होतील त्यांची निवड रद्द करण्यात यावी व अशा रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रारीची दाद मागता येईल. शिक्षणाधिकारी यांचा निर्णय मान्य नसल्यास विभागीय शिक्षण उपसंचालक यांचेकडे दाद मागता येईल व त्यांचा निर्णय अंतिम राहील. शासन निर्णय दिनांक २९.०४.२०१४ नुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा, तालुका व न.पा./म.न.पा. स्तरावर तक्रार निवारण केंद्र व मदत केंद्राची स्थापना करावी.

१९. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी ३ टप्प्यांएवजी एकाच टप्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतिक्षा यादी (बेटींग लिस्ट) तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. मगच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एनआयसी द्वारा पाठविला जाईल. मगच दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पद्धतीने आरटीई प्रवेश पात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एनआयसी कडून मेसेज पाठविले जातील.

२०. गट शिक्षण अधिकारी यांनी सदर परिपत्रकाचे गांभिर्याने अवलोकन करावे आणि अनावश्यक बाबीकरीता पालकांचे अर्ज अपीलात पाठवू नयेत व पालकांची दिशाभूल अथवा धावपळं होणार नाही याची दक्षता घ्यावी.

२१. शाळांना आरटीई पोर्टलवर शाळेच्या पत्यामध्ये काही बदल करावयाचा असल्यास त्यांनी गट शिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क करणे अनिवार्य राहिल.

२२. प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही.

२३. काही NGO पालकांचे अर्ज भरून देतात त्यामध्ये पाल्याच्या निवासाचे स्थान (लोकेशन) जाणीवपूर्वक शाळेच्या जवळ दाखवतात/चुकीचे भरले जातात अशा संस्थाबाबत तक्रार प्राप्त झाल्यास त्या संस्थावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच पडताळणी समितीने पत्याबाबत अचूक खात्री करावी.

२४. पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा.

२५. विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही.

२६. शासनाचे पत्र दिनांक ०५/०२/२०१९ मध्ये दिलेल्या इतर सूचनांनुसार व दिनांक ०७/०१/२०२२ मध्ये दिलेल्या सुधारित सूचनांनुसार सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबवावी.

२७. शैक्षणिक वर्ष २०२०-२९ या शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई २५ टक्के अंतर्गतची प्रवेश प्रक्रिया ही दिनांक २०/०१/२०२९ मध्ये बंद झाली व सन २०२१ – २२ ची ही प्रवेश प्रक्रिया ही माहे जानेवारी मध्ये बंद झाली आहे सदरील वस्तुस्थिती विचारात घेता इतक्या उशिरापर्यंत प्रवेश प्रक्रिया होत असल्याने अशा उशिरा प्रवेशित विद्यार्थ्याचे त्या वर्षाचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी शिकवला गेला असल्याने होणारे शैक्षणिक नुकसान व त्याची अनुपस्थिती या समस्या प्रकर्षाने उद्भवत असल्याचे दिसून येते. तरी हे नुकसान टाळण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के अंतर्गतची प्रवेश प्रक्रिया ही त्या वर्षाच्या ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. तसेच ३० सप्टेंबर २०२२ या दिनांकानंतर जरी आरटीई २५ टक्के अंतर्गत राखीव जागा प्रवेशाविना रिक्त राहत असल्या तरी प्रवेश प्रक्रिया बंद करण्यात येईल.

२८. सदरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी करावी.

Rte 25 % प्रवेश सन 2022-23 साठी ऑनलाईन अर्ज पोर्टल:

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील महाराष्ट्र शालेय शिक्षण RTE 25% आरक्षण प्रवेश पोर्टलला भेट द्या.

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex

हेही वाचा – आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता निवासी पुराव्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य; शिक्षण संचालनालयाची माहिती.

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.