जिल्हा परिषदतलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र जमीन महसूल कायदामहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामे

ई-पीक पाहणी बाबत मार्गदर्शक सूचना – E-Peek Pahani Guidelines

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका भाग (४-खंड) भाग दोन, महाराष्ट्र राज्यातील ग्राम पातळीवरील महसूली लेखांकन पध्दती, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ मधील तरतुदीनुसार राज्याच्या ग्रामीण क्षेत्रात ग्राम पातळीवर महसूली तेथे ठेवण्याकरिता विविध गाव नमुने व दुय्यम नोंदवहया विहित करण्यात आलेल्या आहेत . यामधील गाव नमुना नं. ७ हा “अधिकार अभिलेख” विषयक असून गाव नमुना नं १२ हा “पिकाची नोंदवही” ठेवण्यासंदर्भात आहे. उक्त नमूद नियमपुस्तिकेतील गाव न. नं. ७/१२ संबंधी खुलासा अधिकार अभिलेख आणि पिकांची नोंदवही या शीर्षाखाली या एकत्रित नमुन्यावरीत सर्वसाधारण सूचना तसेच पीक नोंदवहीमधील नोंदी घेण्यासंदर्भातील कार्यपध्दती नमूद केलेली आहे. त्यानुसार गाव नमुना नं. १२ मधील पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी घ्यावयाच्या असून, गावभेटी नंतर सदर नोंदी चुकीच्या आढळल्यास त्या दुरुस्त करण्याबाबतचा अधिकार मंडळ निरीक्षक किंवा त्याहून वरिष्ट असलेल्या अधिकारी यांना आहे. उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक ३० जुलै २०२१ अन्वये पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील आज्ञावली द्वारे ( Mobile App ) गाव न. नं. १२ मध्ये नोंदविण्याची सोय स्वतः शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचा महात्वाकांक्षी ” ई पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याच्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्यात आले आहेत.

ई-पीक पाहणी बाबत मार्गदर्शक सूचना – E-Peek Pahani Guidelines:

क्षेत्रीय स्तरावरून पीक पाहणी Real time crop data संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर data संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक नोंदणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट भ्रमणध्वनीमध्ये ई-पिकपाहणी ॲपची स्थापना करून पीक पाहणी नोदवण्याची नवीन पध्दत दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात लागू केली आहे.
वरील सर्व पार्श्वभूमीवर ज्याअर्थी पूर्वीच्या पिकांच्या नोंदी या संबंधित तलाठी यांनी पेनाच्या पद्धतीमध्ये बदल होऊन आता शेतकऱ्यांनी त्यांच्या स्मार्ट भ्रमणध्वनी मधील ई-पिकपाहणी आज्ञावली द्वारे पिकांची माहिती नोंदविण्यास सुरुवात झालेली आहे. त्याअर्थी स्मार्ट भ्रमणध्वनीमधील ई- पिकपाहणी आज्ञावली द्वारे ई – पीक पाहणी करावयाची सुधारित कार्यपध्दती पुढील प्रमाणे अवलंबविण्यात यावी.

वेब आज्ञावलीद्वारे पिकांच्या नोंदवहीत नोंदी करण्याची प्रक्रिया:

( १ ) दरवर्षी लागवड केलेली पिके शेतात उभी असताना केव्हाही आणि शासनाने वेगवेगळ्या पिकांसाठी ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत किंवा यथास्थिती शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तीने, शेतात लागवड केलेली पीके वेब आज्ञावलीमध्ये विहित केलेल्या पध्दतीने आणि शासनाने निर्देशित केलेल्या पध्दतीनुसार नोंद करणे आवश्यक राहील. त्या त्या हंगामासाठी लागवड केलेली पिके शासनाने दिलेल्या अधिमान्यतेनुसार मोबाइल किंवा इतर कोणत्याही उपकरणाद्वारे नोंदवली जातील.

( २ ) जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तीने लागवड केलेल्या पिकांच्या तपशीलाबरोबर लागवड केलेले पिकाचे क्षेत्र, जलसिंचनाचे स्रोत व प्रकार, शेताच्या बांधावरील झाडे, कायम पड जमीन, असल्यास शेतातील पायाभूत सुविधा आणि शासनाने वेळोवेळी निर्देशीत केलेल्या बाबी यांची माहिती नोंदवणे आवश्यक असेल.

( ३ ) जमीन मालक किंवा जनिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तीने उभ्या पिकाचे, बांधावरील झाडांचे आणि त्याने प्रविष्ट केलेल्या कायम पड जमिनीचे अक्षांश आणि रेखांशासह जिओ टॅग केलेले छायाचित्र वेब आजावलीद्वारे अपलोड करणे आवश्यक असेल.

( ४ ) जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तीने त्याने नमूद केलेल्या नोंदींच्या सत्यतेबावत वेब आज्ञावलीद्वारे स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक असेल.

( ५ ) जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणारी व्यक्तीने ई पीक पाहणी प्रणालीद्वारे नोंदविलेली पिकांची माहिती, अशी माहिती नोंदविल्यापासून ४८ तासांच्या आत स्वतः दुरुस्त करू शकेल.

( ६ ) उक्त मुद्दा क्रमांक ५ मध्ये नमुद केलेला कालावधी संपल्यानंतर जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तीने नोंदविलेल्या पिकांची आणि इतर माहिती मुद्दा क्रमांक ७ मध्ये नमूद बाबी वगळता वैध मानली जाईल आणि गाव नमुना १२ मध्ये प्रतिबिंबित होईल.

( ७ ) शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या मापदंड आणि अटीवर आधारित ( उदा. अस्पष्ट नोंदी, किंवा चुकीचा जिओ टॅग केलेला फोटो अपलोड करणे इत्यादी ) ई पीकपाहणी प्रणालीत माहिती अपलोड करणाऱ्या एकूण खातेदारांपैकी किमान १०% खातेदारांच्या माहितीची पडताळणी तलाठ्यांद्वारे करण्यात येईल.

( ८ ) प्रत्येक हंगामासाठी जमीन मानक किंवा जमिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तींना शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये किंवा यथास्थिती शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये मोबाईल ॲपद्वारे पीक पाहूणी न नोंदविलेल्या खातेदारांची पिक पाहणी संबंधित तलाठी यांनी शासनाने त्या हंगामासाठी ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करणे आवश्यक राहिल.

( ९ ) शासनाने किंवा यथास्थिती शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तीने ई पीकपाहणी प्रणालीद्वारे पिकांच्या नोंदीसाठी ठरवून दिलेली कालमर्यादा संपुष्टात आल्यानंतर उक्त मुद्दा क्रमांक ७ मध्ये नमूद तरतुरदीच्या अधीन राहून तलाठी, त्याच्या गाव भेटीचा दिनांक, किमान सात दिवस अगोदर निश्चित करेल आणि असा दिनांक व गाव भेटीचा उद्देश याबद्दल, दवंडीने किंवा अन्य कोणत्याही योग्य पद्धतीने गावकऱ्यांना सुचीत करेल. त्याचप्रमाणे तो गाव भेटीची माहिती सरपंच, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आणि इतर संबंधीतांना देईल आणि गावभेटीच्या दिवशी पिक पाहणी पडताळणीच्या वेळी त्याच्यासोबत उपस्थित राहण्याची विनंती करेल.

( १0 ) गाव भेटीसाठी निश्चित केलेल्या दिनांकास तलाठी उक्त मुद्दा क्रमांक ७ प्रमाणे निश्चित केलेल्या खातेक्रमांक निहाय प्रत्येक भूमापन क्रमांक किंवा भूमापन क्रमांकाच्या उपविभागास गावकरी, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यापैकी उपस्थित असतील त्यांच्यासह भेट देईल आणि त्या त्या भूमापन क्रमाकांच्या संदर्भात जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या पिकाच्या नोंदींची पडताळणी करेल आणि त्या नोंदी योग्य आढळल्यास त्यास मान्यता देईल किंवा त्यात आवश्यक दुरुस्त्या केल्यानंतर त्या सत्यापित करेल.

( ११ ) मोबाईल उपकरणाद्वारे किंवा इतर कोणत्याही उपकरणाद्वारे नोंदणी केलेल्या ई पीक पाहणी नोंदीतील दुरुस्तीसाठी जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणारी व्यक्ती किंवा ग्रामस्थ संबंधित तलाठी यांचकडे अर्ज करू शकतील. त्याचप्रमाणे तलाठी स्तरावरून करण्यात आलेली पीक पाहणी व तलाठी यांनी मुद्दा क्रमांक ७ प्रमाणे पडताळनीअंती सत्यापित केलेल्या कोणत्याही नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतील.

( १२ ) मुद्दा क्रमांक ( ११ ) च्या तरतुदी नुसार, असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर तलाठी / मंडळ अधिकारी नोंदीची पडताळणी करण्याच्या उद्देशाने वर नमूद केल्याप्रमाणे अर्जदारास व गावकऱ्यांना आगाऊ सूचना देऊन गावाला भेट देइल आणि रीतसर आवश्यक ती चौकशी व पंचनामा केल्यानंतर चुकीच्या आढळून येणाऱ्या नोंदी दुरुस्त करेल.

( १३ ) जमीन मालक किंवा जमिनीत लागवड करणारी व्यक्तीने शासनाने दिलेल्या अधिमान्यतेनुसार मोबाइल किंवा इतर कोणत्याही उपकरणाद्वारे नोंदवलेली किंवा तलाठ्याने सत्यापित व मंजूर केलेल्या ई- पीकपाहणी नोंदी, जोपर्यंत उलट सिद्ध होत नाहीत तोपर्यंत सर्व शासकीय योजना आणि लाभ जसे की, पीक कर्ज, पीक विमा इत्यादीसाठी वैध मानल्या जातील. सदरच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती.

हेही वाचा – ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.