महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेष

महाराष्ट्र ग्रामपंचायत मासिक सभा नियम – Maharashtra Grampanchayat Masik Sabha Niyam Marathi

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. आपल्या गावातील ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार पारदर्शक होऊन, व्यवस्थितपणे चालावा तसेच ग्रामपंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत संप्रेषण असायला हवे म्हणून दरमहा एक मासिक सभा ग्रामपंचायतीला घ्यावी लागते. या सभेला ग्रामपंचायतीची “मासिक सभा’ असे म्हटले जाते. ग्रामपंचायतीची प्रत्येक महिन्यास एक अशा वर्षातून बारा बैठका बोलावल्या जातात. गावामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणतेही कारण देऊन बैठक बोलवता येते.

महाराष्ट्र ग्रामपंचायत मासिक सभा नियम:

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार ग्रामपंचायतचे कामकाज व्यवस्थितपणे चालावे म्हणून मासिक सभेचे नियम शासनाने खालील प्रमाणे निर्गमित केलेले आहेत.

१. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३६ नुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (सभा बाबत) नियम १९५९ मधील तरतुदीनुसार प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे सरपंच/उप-सरपंचांना बंधनकारक आहे.

२. मासिक सभेची नोटीस सभेपूर्वी किमान पूर्ण तीन दिवस अगोदर ग्रामपंचायत सदस्यांना देणे /बजावणे आवश्यक आहे.

३. विशेष मासिक सभेची नोटीस किमान एक पूर्ण दिवस अगोदर देण्यात यावी.

४. सभेच्या नोटिशी मध्ये दिनांक, वेळ, ठिकाण व विषय पत्रिकेचा समावेश असावा.

५. विषय पत्रिका अंतिम करण्याचा अधिकार सरपंच यांना आहे.

६. तीन किंवा तीन पेक्षा अधिक सदस्यांनी एखादा विषय, विषय पत्रिकेत घेण्यासाठी सरपंच यांना नोटीस दिली, तर तो विषय, विषय पत्रिकेत घेणे सरपंचांना बंधनकारक आहे.

७. मासिक सभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सरपंच असतील. त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच किंवा उपसरपंचाच्या अनुपस्थितीत, उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतील.

८. मासिक सभेची गणपूर्ती (कोरम) होण्याकरिता १/२ सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. ही उपस्थिती मोजताना सरपंच, उपसरपंच यांचा समावेश करावा लागतो.

९. एखाद्या ठरावावर एकमत न झाल्यास, अध्यक्ष यांनी सदर ठरावावर आवाजी, हात उंचावून किंवा गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेऊन त्यानुरूप कार्यवाही करावी. एखाद्या ठरावास सम समान मते पडल्यास अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे.

१०. जेव्हा एखाद्या मुद्द्यावर कायदेशीर विवाद होईल, त्या विषयावर ग्रामसेवकाने स्वतःचे कायदेशीर मत सभावृत्तांत नोंदविणे अभिप्रेत आहे.

११. सभेचे कामकाज संपल्यानंतर कार्यवृत्तांत लिहून अध्यक्ष यांचे सहीनिशी बंद करावा. सदरचा कार्य वृत्तांत ७ (सात) दिवसांच्या आत पंचायत समितीला सादर केला पाहिजे. याची जबाबदारी ग्रामसेवक/सचिव यांची राहील.

१२. ठरावाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अध्यक्ष, सचिव व ग्रामपंचायतीची राहील.

१३. एखाद्या ठरावात बदल किंवा तो रद्द करावयाचा असल्यास, सदर ठराव तीन महिन्यानंतर सभेत चर्चा करून बहुमताने बदल किंवा रद्द करण्यात येईल. तीन महिन्यांपर्यंत २/३ बहुमत तथा तीन महिन्यानंतर साध्या बहुमताने फेरबदल करता येईल.

१४. सभेची गणपूर्ती विहित वेळेत न झाल्यास, अर्धा तास वाट पाहूनही गणपूर्ती झाली नाही, तर अशी सभा तहकूब करण्यात यावी. तसेच तहकूब झालेली सभा त्या दिवसानंतर इतर कोणत्याही दिवशी घेता येईल. या सभेचा दिनांक, ठिकाण, वेळ निश्चित करून सभा सूचना नोटीस ग्रामपंचायतीच्या फलकावर लावावी. तहकूब सूचनेची नोटीस प्रत्येक सदस्याला देण्याची तरतूद नाही.

१५. सरपंच यांनी मासिक सभा महिन्यातून किमान एकदा घेणे बंधन कारक आहे. तसेच सरपंच यांनी सभा बोलविण्यात कसूर केल्यास उपसरपंचानी ही सभा बोलवावी. सरपंच/उपसरपंच यांनी सभा घेण्यास किंवा बोलविण्यास असमर्थता दर्शविल्यास अशी बाब ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही ग्रामसेवकांनी करावी, असे अभिप्रेत आहे.

१६. ग्रामपंचायतीची सभा बोलविण्यास किंवा घेण्यात सरपंच/उपसरपंच यांनी कसूर केल्यास सरपंच/उपसरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई कलम ३६ नुसार होऊ शकते. सभा न घेण्यासाठीचे कारण पुरेसे होते की नाही, याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. सभा न बोलविल्यास ग्रामसेवक/सचिव यांच्यावर प्रशासकीय कारवाई होऊ शकते.

१७. सदस्यांच्या मागणी वरून एखादा विषय बहुमताने मंजूर केला गेल्यास व तो ठराव गावाच्या व्यापक हितास बाधा निर्माण करणारा असेल तर सरपंच अशा ठरावाची अंमलबजावणी थांबविल. असा ठराव लगतच्या ग्रामसभेत ठेवण्याची व्यवस्था करील, त्यावर ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल.

१८. मासिक सभा ठरावाची अंमलबजावणी करण्याकरता संबंधित विभागाला ठराव सादर करण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवक यांची राहील.

१९. सलग सहा महिने सतत गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना अध्यक्ष, जिल्हा परिषद हे अपात्र ठरवतील. तशी त्यांच्याकडे तक्रार आल्यास किंवा स्वतःहून अशा गैरहजर सदस्यांची नोंद घेऊन, त्याला बाजू मांडण्याची संधी देऊन न्याय निर्णय देतील.

ग्रामपंचायतीच्या बैठकीची वेळ व जागा आणि सभेतील कार्यपद्धती:

पंचायतीच्या बैठकीची वेळ व जागा व तिच्या सभेतील कार्यपद्धती या गोष्टी विहित करण्यात येतील अशा असतील.

जर सरपंच किंवा त्याच्या अनुपस्थितीत उपसरपंच, पुरेशा कारणाशिवाय, त्याबाबत विहित केलेल्या नियमांप्रमाणे कोणत्याही वित्तीय वर्षात पंचायतीच्या सभा बोलावण्यात कसूर करील, तर तो सरपंच किंवा यथास्थिती, उपसरपंच म्हणून चालू राहण्यास किंवा पंचायतीच्या सदस्यांच्या पदाच्या उरलेल्या कालावधीसाठी असा सरपंच किंवा उपसरपंच म्हणून निवडला जाण्यास अपात्र ठरेल.तत्सबंधात पुरेसे कारण होते किंवा नव्हते या प्रश्नावरील जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल.

ठरावांमध्ये फेरबदल करणे किंवा ते रद्द करणे: पंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या दोन-तृतीयांशाइतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज, इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत कोणताही फेरबदल, सुधारणा किंवा फेरफार करता येणार नाही किंवा तो रद्द करता येणार नाही.

ग्रामपंचायत मासिक सभेत ग्रामस्थांची उपस्थिती बाबत:

पालघर जिल्ह्यातील एका ग्रामस्थाने ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा केल्यामुळे, पालघर जिल्हाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाचे परिपत्रक क्र. पीआरसी १०७७/२७०३/सीआर- २७३२ दि. १९/०९/१९७८ रोजीचा संदर्भ देताना, मासिक सभेस ग्रामस्थांची उपस्थिती असावी असे पत्रात नमूद केले होते पण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात याबाबत अस्पष्ट संकेत आहेत. या विषयीचा स्पष्ट शासन निर्णय किंवा परिपत्रक नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे मुळात प्रशासनच याबाबत संभ्रमात असल्याचे दिसून येते. या कारणांमुळे, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ग्रामसस्थांची उपस्थित असावी की नाही? याबत अजुनही प्रश्नचिन्हचं आहे.

हेही वाचा – ग्रामपंचायत ग्रामसभा नियम व अटी (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “महाराष्ट्र ग्रामपंचायत मासिक सभा नियम – Maharashtra Grampanchayat Masik Sabha Niyam Marathi

  • सागर श्रीधर गोसावी

    साहेब
    1)एखादा ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थांवर बिनबुडाचे आरोप करत असेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते का. २)आमच्या गावातील ग्रामसभा ह्या नेहमीच तहकूब होत असतात तर ह्या बाबत काही नियम आहेत का किंवा GR.

    Reply
  • सागर श्रीधर गोसावी

    इलेक्शन च्या वेळी झालेला खर्च आपण अश्या प्रकारे मागवू शकतो.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.